संसदच सर्वोच्च; त्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही : धनखड   

नवी दिल्ली : संसद लोकशाहीत सर्वोच्च आहे. संसदेपेक्षा कोणताही अधिकार श्रेष्ठ नाही. भारतीय राज्यघटना कशी असेल? त्यात कोणत्या सुधारणा करायच्या हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार केवळ खासदारांना आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मंगळवारी येथे केले.
 
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना विधेयकाबाबत निर्णय घेण्यासाठी नुकतीच कालमर्यादा घालून दिली होती. त्यावर, धनखड यांनी सर्वोच्च न्यायालयावर टीका केली होती. न्यायपालिका सुपर संसदेची भूमिका बजावू शकत नाही. न्यायालये राष्ट्रपतींना आदेश देऊ शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले होते. तर, विरोधकांनी धनखड यांच्यावर रोष व्यक्त केला होता. त्यावर, धनखड यांनी पुन्हा एकदा आपले मत व्यक्त केले आहे. संसद ही देशातील सर्वात मोठी संस्था आहे आणि राज्यघटना कशी असेल हे निवडून आलेले खासदार ठरवतील. कोणतीही संस्था संसदेपेक्षा वर असू शकत नाही, असे धनखड यांनी म्हटले आहे.
 
लोकशाहीमध्ये संवाद आणि खुली चर्चा खूप महत्त्वाची आहे. लोक गप्प राहिले तर त्यामुळे नुकसान होऊ शकते, असे धनखड म्हणाले. घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्तींनी नेहमीच राज्यघटनेनुसार बोलले पाहिजे. आपल्या संस्कृतीचा आणि भारतीयतेचा अभिमान बाळगायला हवा. देशात अशांतता, हिंसाचार आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे योग्य नाही. गरज पडल्यास कठोर पावलेही उचलली पाहिजेत, असेही धनखड म्हणाले.
 

Related Articles